Digital India:भारताच्या इतिहासात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेली प्रगती 2014 नंतर अभूतपूर्व ठरली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने डिजिटल क्रांतीकडे प्रचंड वेगाने वाटचाल केली. 5G, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), ब्रॉडबँड, भारतनेट यांसारख्या योजनांमुळे आज देशातील शेवटच्या नागरिकापर्यंत तंत्रज्ञान पोहचले आहे.

ग्रामीण भागातील क्रांती
मोदी सरकारच्या पहिल्या टर्मपासून ग्रामीण भारतात इंटरनेट पोहोचवण्याचे आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे विशेष प्रयत्न झाले. त्यामुळे आता दूरदूरच्या गावांमध्येही मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा सहज उपलब्ध झाली आहे. शिक्षण, आरोग्य, सरकारी सेवा आणि शेतीसारख्या क्षेत्रांमध्ये हे महत्त्वाचे ठरले.
Digital India अभियान
2015 साली सुरू झालेलं Digital India हे मोदी सरकारचं प्रमुख अभियान ठरलं. याचा उद्देश म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाला डिजिटल सुविधा मिळवून देणं. या अंतर्गत भारतनेट प्रकल्प, डिजिलॉकर, उमंग अॅप, आधार लिंक सेवा, ई-गव्हर्नन्स यांचा समावेश आहे.
टेलिकॉम क्षेत्रात मोठी भरारी
- 2014 मध्ये भारतात एकूण टेलिफोन कनेक्शन 93.3 कोटी होती, ती आता एप्रिल 2025 पर्यंत 120 कोटींपर्यंत पोहचली आहे.
- शहरी कनेक्शन 55.52 कोटीवरून 66.13 कोटीवर
- ग्रामीण कनेक्शन 37.77 कोटीवरून 52.73 कोटी
या वाढीमुळे ग्रामीण भारतातही संवाद आणि सेवा पोहोचवणं सोपं झालं आहे.
इंटरनेटचा झपाट्याने विस्तार
2014 मध्ये देशात फक्त 25.15 कोटी इंटरनेट कनेक्शन होती. आता ही संख्या 96.96 कोटींपर्यंत पोहचली आहे. म्हणजे तब्बल 285% वाढ. त्यामुळे भारत खऱ्या अर्थाने ‘डिजिटल राष्ट्र’ बनत आहे.
ब्रॉडबँड क्रांती
ब्रॉडबँड कनेक्शन 6.1 कोटींवरून वाढून 94.92 कोटी झाली आहेत. ही वाढ तब्बल 1452% इतकी आहे. ब्रॉडबँडच्या वाढीमुळे अनेक डिजिटल सेवा, ऑनलाइन शिक्षण, व्यवसाय, बँकिंग सहज शक्य झालं आहे.
भारतनेट: गावोगावी इंटरनेट
भारतनेट हा ग्रामीण भारताला इंटरनेटने जोडणारा प्रकल्प आहे. याअंतर्गत 2.18 लाखांहून अधिक ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा देण्यात आली आहे. 6.92 लाख किमी ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात आली आहे. त्यामुळे आज गावांमध्येही ऑनलाइन व्यवहार शक्य झाले आहेत.
डिजिलॉकर
2015 मध्ये सुरू झालेल्या डिजिलॉकर सेवेचा उपयोग नागरिक आता मोठ्या प्रमाणावर करत आहेत. पूर्वी केवळ 9.98 लाख वापरकर्ते होते, आता ती संख्या 20.31 कोटींवर पोहचली आहे. महत्त्वाचे कागदपत्रं डिजिटल स्वरूपात साठवण्याची ही एक महत्त्वाची सुविधा ठरली आहे.
4G आणि 5G क्रांती
2016 पासून 4G कनेक्टिव्हिटीचा देशभरात मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. डिसेंबर 2024 पर्यंत 6.44 लाख गावांपैकी 6.15 लाख गावांमध्ये 4G सेवा पोहोचली आहे.
5G सेवा ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू झाली. 22 महिन्यांत 4.74 लाख बेस ट्रान्सिव्हर स्टेशन (BTS) बसवण्यात आले. 99.6% जिल्ह्यांमध्ये 5G सेवा पोहोचली आहे. त्यामुळे डिजिटल सेवा अधिक वेगवान आणि सुलभ झाल्या आहेत.
इंटरनेट दरात मोठी घट
2014 मध्ये 1GB इंटरनेटसाठी 308 रुपये मोजावे लागत होते. 2022 मध्ये ही किंमत 9.34 रुपये प्रति GB इतकी खाली आली. ही एक सामान्य नागरिकासाठी क्रांतिकारी गोष्ट ठरली आहे.
AI आणि नव्या योजना
AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातही भारत आता जागतिक पातळीवर पाऊल टाकतो आहे. सरकार AI मिशनच्या माध्यमातून संशोधन, स्टार्टअप्स आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देत आहे. यामुळे भारतातील नोकरीच्या संधी, स्टार्टअप्सना चालना मिळणार आहे.